जगण्याचा संघर्ष इथं "पुराना" आहे...
२१ व्या शतकाच्या सुरुवातीची गोष्ट... "देखो २००० जमाना आगया" हे आमिर खानचं मेला पिक्चरमधील गाजलेलं गाणं त्यावेळेस टीव्हीवर 'चित्रहार आणि छायागीत' मध्ये हमेशा लागायचं... आणि "मेला" पिक्चरसुद्धा शुक्रवारी रात्री ९:३० वाजता बऱ्याचवेळा दूरदर्शनवर लागायचा... साधारण ६-७ वर्षांचा असेल मी तेंव्हा... त्यावेळी गावातील इतर मुलां-मुलींप्रमाणे मी देखील सिंदखेड ह्या माझ्या नाल्याकाठच्या गावात हसत-खेळत बेफिकीर बागडायचो...
दुनियादारीशी माझा अजूनतरी तरी तसा संबंध आला नव्हता...
आधीच मराठवाड्यातलं गाव अन त्यात आमच्या गावात असलेली पांढरीची जमीन म्हणजे दुष्काळात तेरावा महिना... त्यावेळेस पावसाळ्यात पाऊस आल्यावर साधारणतः डिसेंबर- जानेवारीपर्यंत पाण्याची चणचण जाणवायची नाही. पण फेब्रुवारीपासून कडक उन्हाळा सुरु झाल्यामुळे गावात पाण्याची वानवा जाणवायला लागायची. त्यानंतर आमच्या गावात पाण्यासाठी एकच उपाय होता... तो म्हणजे आमच्या गावातील नाला...
माझ्या गावाची ठेवण सुद्धा विशिष्ठ अशीच आहे. गावाभोवती नाला यू आकाराचा आहे. गावाला नाला गोल फिरकी मारून जातो. नाल्याच्या 'यू' आकाराच्या मधल्या भागात ज्या ठिकाणी मी राहायचो ते म्हणजे लिंगमपेठ... सिंदखेडमधली छोटी वस्ती... आणि यू आकाराच्या एका काठावर सिंदखेड आणि दुसऱ्या काठावर दोन्ही गावातील लोकांची शेती... नाला बरोबर सिंदखेड आणि लिंगमपेठच्या मध्ये होता... आणि उन्हाळ्यात दोन्हीकडचे लोकं पाणी भरायला नाल्यावर यायचे.
नाल्यात ज्या ठिकाणी खोलगट भाग आहे त्या ठिकाणी उन्हाळ्यात डांबराच्या किंवा तेलाच्या टाक्या रेतीमध्ये गाडून पाणी वर काढल्या जायचं. त्यातूनच मग पिण्याचं सोडून इतर वापराचं पाणी कावडीने सर्व लोकं आपआपल्या घरी घेऊन जायचे. पिण्याच्या पाण्यासाठी रेतीमध्ये छापे किंवा झिरे बनविल्या जायचे. रेतीमध्ये उथळ खोलगट भाग बनवून त्यात वर जे पाणी यायचे ते मग स्वच्छ कापडाच्या साहाय्याने कळशी किंवा हंड्यात गाळून पिण्यासाठी ते पाणी वापरले जायचे. परंतु त्यासाठी आधी तो झिरा छापल्यावर पाणी वर येऊन... त्यातला गाळ खाली जमून ते पाणी स्वच्छ होण्याची तासनतास वाट पाहावी लागायची.
गावात महार, वाणी, आदिवासी, कुणबी, बंजारा (गोरमाटी) आणि ब्राह्मण जातीची बऱ्यापैकी घर होती. पाणवठ्यावर सिंदखेडमधून ब्राह्मणाच्यादेखील बाया पाणी भरायला यायच्या. आणि लिंगमपेठमधून मी कधी-कधी मम्मी आणि काकूसोबत पिण्याचे पाणी भरायला जायचो. सिंदखेडकडील नाल्याचा भाग बऱ्यापैकी उंचावर आहे. त्यामुळे तिकडून येणाऱ्या माणसाला लिंगमपेठ मधून कोण नाल्यावर येतंय ते बरोबर दिसायचं. एके दिवशी असाच मी मम्मीसोबत पाणी भरायला गेलो असता बामणाच्या काही बायांनी त्यांच पाणी भरून झाल्यावर; मम्मी आणि काकू येताना बघुन तो पाणवठ्यातील झिरा बुजवून आणि गढूळ करून ठेवला आणि सिंदखेडच्या उमाटाकडून त्यांच्या घरी परत जात होत्या. नाल्यावर पोहोचल्यावर मम्मी आणि काकू चिडून रागानं लाल झाल्या.
"हालकट कुठल्या कि बदमाश बाया... दरवेळेस असंच करून जातात. ह्यांच्या काय बापाचं खाल्लं काय आम्ही... पियायच पाणी गढूळ करून जायला काय दुखते कि यायची... बामन कुठल्या की... आज बी यायच्यातले जातीचे किडे काय मरत नाही..." त्यांचं झिरा छापत छापत बोलणं सुरु होत आणि मी आपला मुकाट्यानं ऐकत होतो.
त्यानंतर काही क्षणांसाठी माझं पोरसवदा मन कावर-बावरं झालं... आणि झर्र्कन होता नव्हता तेवढा अभिमान पांढऱ्या मातीत मिसळला... कारण गावात पाटील सरांचा म्हणजे पप्पांचा रुबाब होता. पाटील सरांचं पोरग म्हणून गावात आणि पोट्यापाट्यात माझी जरा वट होतीच म्हणा. हा प्रसंग कायमचा माझ्या मनावर कोरल्या गेला... शेवटी दुनियादारीशी माझा संबंध आलाचं... अगदी ७-८ वर्षाच्या पोरसवदा वयातंच...!
नंतरच्या आयुष्यात मम्मी आणि पप्पासोबत बऱ्याचदा चर्चा करताना त्यांनी देखील त्यांच्यासोबत घडलेले असे अनेक जातीवादी प्रसंग मला सांगितले.
वैद्यकीय शिक्षण घेत असताना विद्यार्थीदशेतचं मी सामाजिक चळवळीत आलो. कॉलेजमधील थोडं सामाजिक भान असलेले मित्र, ज्यांना कधी जातीवादाचे चटके बसले नव्हते; ते सांगायचे की आम्हाला जात तर डिग्रीला ऍडमिशन घेतानाच कळली... आधीतर आम्हाला जातचं माहिती नव्हती...! काही SC/ST मित्र देखील म्हणायचे की आम्हाला जात फक्त कास्ट सर्टिफिकेट आल्यावरच कळाली... काही अंशी ते खरं जरी असलं तरी माझ्या बाबतीत नक्कीच ते तसं नव्हतं... जात तुम्हाला जन्मापासूनच चिकटलेली असते... तुम्हाला ती कळो अथवा ना कळो... समजो अगर न समजो... तुम्ही जात माना कि नका मानू... जात तुमचा पिच्छा सोडत नाही... त्यामुळे जातीसोबत येणारा संघर्षही येथे अपरिहार्यचं असतो.
आज १५-२० वर्षानंतर गावात मुबलक पाणी आलंय. योगायोगाने ५-७ वर्षांपूर्वी गावात जेंव्हा पिण्याचा पाण्याचा कायमस्वरूपी स्रोत नव्हता... त्याच वेळेस आमच्या शेतात खोदलेल्या विहिरीला १५-२० फुटावरच पाणी लागलं... आणि शेत गावाला लागूनच असल्यामुळे सारा गाव पिण्याचे पाणी भरायला विहिरीवर यायचा... त्यात त्या बामनाच्याही घरचे लोक यायचे...! आजही बरीच लोक येतात... आणि पूर्वाश्रमीच्या महार मास्तराच्या शेतातल्या विहिरीचं "चवदार पाणी" पिऊन तृप्त होतात.
आम्हाला पाण्याच्या घोटासाठीदेखील इथे तरसावं लागलं आहे आणि इथल्या व्यवस्थेसोबत झगडावं लागलं आहे. आज बऱ्याच अंशी जीवन सुसह्य झालं असलं तरी हा झगडा फक्त पाण्यासाठी कधी नव्हता मुळीच... बाबासाहेबांच्याचं शब्दात सांगायचं झालं तर...
#ThanksAmbedkar 💙
© डॉ. प्रणित उर्मिला संजय पाटील
M.B.B.S., M.D. (Community Medicine)
दि. २०/०३/२०२३.
खूप छान 👍👍👍👍👌
ReplyDeleteKhup bhari sir
ReplyDeleteखूप भारी👍👏
ReplyDeleteछान
ReplyDeleteKhup chan sir
ReplyDeleteखूप छान सर
ReplyDeleteखूप छान... 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
ReplyDeleteMst
ReplyDelete👍👍👍👌
ReplyDeleteNice sir 🤝👍🌹
ReplyDeleteअप्रतिम मांडणी 👍👍👍
ReplyDelete👌❤️
ReplyDeleteखुप छान दाजी👌👌👌
ReplyDeleteछान मांडणी।
ReplyDeleteखूपच छान... 👍
ReplyDeleteChhan sir
ReplyDeleteSir keep writing ..Pen is the a powerful weapon to bring change in society
ReplyDelete👌👌👌
ReplyDeleteमस्त मस्त
ReplyDeleteखुप भारी सर👌👌
ReplyDelete